चिखली, (वार्ताहर) – उद्योगनगरीमध्ये मागील काही दिवसांपासून दुपारी ऊन, रात्री, पहाटे थंडी वाढली आहे. वातावरणात सतत बदल होत आहे. परंतु दुपारचे ऊन असहाय्य होत असल्याने नागरिक पोटात गारवा निर्माण करणार्या रसाळ फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होऊ लागले आहे. शरीरातील पाण्याची क्षमता टिकून ठेवण्यासाठी नागरिक थंडपेय व रसाळ फळांना पसंती देत आहेत. विशेषत: कलिंगड, खरबूज, द्राक्षे, संत्री आणि मोसंबीला मागणी वाढली आहे.
ज्यूस विक्रेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून या फळांना मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठेत फळांचे भाव तेजीत आहेत. किरकोळ विक्रीमध्ये व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. मार्केटमध्ये सध्या कलिंगडला 10 ते 15 रुपये किलोला भाव आहे. परंतु बाजारात ग्राहकांना देताना व्यावसायिक 20 ते 30 रुपये किलोने विक्री करत आहेत.
मोसंबी आणि संत्राला मागणी वाढली आहे. शरीरातील सी व्हिटॅमिनची कमतरता पडू नये यासाठी नागरिक संत्री, मोसंबी खाण्यावर भर देत आहेत. त्यामुळे शरीर प्रकृती ठिक राहण्यास मदत होत आहे. उष्णता वाढत असल्याने या रसाळ फळांना मागणी वाढली आहे. तर द्राक्षे सध्या किरकोळ विक्रीसाठी 50 ते 60 रुपये किलो दरराने मिळत आहेत.