लोणी काळभोर, (वार्ताहर) – थेऊर (ता. हवेली) येथील गेली 13 वर्षे बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 9 मार्च रोजी होणा-या निवडणुकीसाठी पॅनेल बनवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे; मात्र कारखान्यासाठी मतदार असलेल्या व मतदार नसलेल्या टेक्नोसेव्ही युवा पिढीचा यापूर्वीच्या कारभा-यांवर राग आहे. हा राग ही पिढी व्हॉटस अप, फेसबुक सारख्या समाजमाध्यमांतून व्यक्त करत आहे.
एका तरुणाने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, यशवंत चालू होतोय ही खरंच आनंदाची चांगली बाब आहे. पण या नेत्यांना कारखान्याचे किंवा शेतकर्यांचे काही देणंघेणं नाहीये. त्यांना कारखान्याचे संचालक, चेअरमन, व्हाइस चेअरमन ही पद घेऊन गावात, तालुक्यात मोठेपणासाठी मिरवायचं आहे. आणि सत्तेतून मिळणारा मलिदा खायचा आहे.
ज्यांना कारखाना क्षेत्रातील काडीचं ज्ञान नाही अशीच मंडळी दिसतील संचालक म्हणून तुम्हाला. आपले पाहुणे, रावळे, भावकी, पैसा या गोष्टींच्या जीवावर निवडून यायचं निवडून आल्यावर चेअरमन, व्हाइस चेअरमन हे पद एक एक वर्षासाठी वाटून घ्यायचं. कारखाना पुन्हा चालू झाला तर ठीक, नाहीतर कारखान्याची उरली सुरली जमीन विकून पण हे बोके खायला कमी करणार नाहीत. देव करो आणि यशवंत कारखाना पुन्हा सुरू होवो.दुसरा तरूण म्हणतोय, यशवंत वाचवायचा नाही, विकुन खायचा आहे. जुन्या संचालकांसह विक्रमी 320 अर्ज दाखल.
तिस-या तरुणाने इच्छुक उमेदवारांना इशारा दिला आहे. नुकत्याच आलेल्या सर्वेनुसार सर्व शेतकरी सभासद त्याचप्रमाणे कामगार सभासद हे त्यांची असणारी कारखान्याकडील येणे रक्कम ही इच्छुक उमेदवार यांच्याकडून या निवडणुकीत वसूल करणार. कारण सर्वांची एकच मानसिकता झालीय की जर 320 फॉर्म जात असतील तर या लोकांना कारखान्याची किती काळजी आहे. तयारीत रहा रे बाबांनो..
चौथ्या तरुणाने लिलाव घेण्याची सूचना केली आहे. चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक पदांसाठी लिलाव घ्या. कारखाना असाच सुरू होईल, बाकी काही करण्याची गरजच नाही.पाचव्या तरुणाने कारखाना परिसरातील गावांमधील ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रत्येक गावातील एक सभासद बॉडीवर घेऊन निवडणूक बिनविरोध करावी. नवीन चेहरा देखील मिळेल आणि विरोध देखील मावळेल.
पाचव्या तरुणाच्या मताला एका तरुणाने उत्तर दिले आहे. उत्तर देताना तो म्हणतो छोटी मोठी मिळून यशवंतच्या कार्यक्षेत्रात 97 गावांतील सभासद आहेत. 1000 पेक्षा जास्त सभासद असलेली फक्त 6 गावे आहेत. यातील सर्वात जास्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन हे फक्त 3 गावातील व्यक्ती झालेत. त्यामुळे त्या तीन गावातील नेते वगळता उर्वरित गावांतील सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तींना संधी मिळावी.
यशवंत सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी इत्यंभूत माहिती आणि शासकीय, न्यायालयीन प्रक्रिया पार पाडणार्या सक्षम आणि यशवंत सुरू करण्यासाठी ज्यांना खरंच वेळ असेल अशाच व्यक्तींनी उभे रहावे. फक्त नावासाठी कुणीही केविलवाणा प्रयत्न करू नये. हा काटेरी मुकुट असून 5 वर्षात यशवंत सुरू नाही झाल्यास शेतकरी सभासदांच्या रोषास आणि बदनामी देखील सामोरे जावे लागेल.सातवा तरुण म्हणतो कारखाना बंद पाडला या सगळ्या टग्यांनी आणि परत काय बिनविरोध झाल्यावर कारखाना चालू होईल… म्हणजे जनता येडी?
पत्रकारांना आवाहन
आठवा तरुण म्हणतो कारखाना बंद का व कसा पडला? कोणामुळे पडला? या सगळ्या गोष्टींना कोण कोण जबाबदार आहेत? याबद्दलची निर्भीडपणे वर्तमानपत्रामधून बातमीची मालिका पत्रकारांनी लावली पाहिजे. कारखान्याचे आर्थिक अनियमितता करून कारखाना ज्या परिस्थितीत बंद पाडला. त्यावेळी या प्रक्रियेत कोण कोण होते त्यांची नावासह प्रसिद्धी पत्रकारांनी द्यावी. आणि आपल्या भागातील शेतकर्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी.