पळसदेव, (प्रतिनिधी) – पोदवडी तालुका इंदापूर भागात अचानक लागल्या आगीमध्ये वन विभागाच्या हद्दीतील वन क्षेत्रातील चार मोठ्या प्रमाणात जाळून खाक झाला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यासाठी असलेल्या वन्य प्राण्यांना या वर्षी चाऱ्याअभावी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. अकोला व पोदवडी गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यातील पोदवडी हद्दीतील गट क्रमांक १५५ मध्ये आग लागून सुमारे ३ ते ४ हेक्टर क्षेत्रावरील चारा आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.
या बाबत वनपाल सनी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बाबत भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कांबळे या वेळी बोलताना दिली. या बाबत आगीची माहिती मिळताच वन विभाग कर्मचारी व काही स्थानिक युवकांच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र, तोपर्यंत वन क्षेत्रावरील चारा व वनसंपदा आगीत नष्ट झाली.
पोदवडी, अकोले, कळस भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्रात चिंकारा जातीचे हरीण, ससे, कोल्हे, लांडगे व विविध पक्षी याचे वास्तव्य आहे. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात चारा जळून गेला आहे. शिवाय या आगीत अनेक वनस्पती,कीटक व पक्षांचे घरटी, पिल्ले, अंडी या आगीत नष्ट झाली आहेत. चार जाळून गेल्याने भागातील हरीण, ससे यांच्यासह इतर प्राण्याचा चाऱ्यासाठी लवकरच भटकंती करावी लागणार, हे नक्की. दर वर्षी तालुक्यातील विविध गावात उन्हाळ्यात वन क्षेत्रांत आग लागून वन्य प्राण्याचा चारा नष्ट होत आहे. तरी देखील या बाबत वन विभाग ठोस उपाय योजना करत नाही.
गाव गावात वन कमिट्या स्थापन करण्यात आल्या नाहीत. तर ज्या गावात काही प्रमाणात वन कमिट्या आहेत. त्या देखील कागदावर असल्याने आपत्ती काळात नागरिकांची मदत होत नाही. जो वन विभाग नागरिकांनी केलेल्या अतिक्रमण कारवाईबाबत कार्यवाहीस तत्पर असतो. तोच वन विभाग कर्मचारी आपत्ती काळात तितकी तत्परता का दाखवत नाहीत, असा प्रश्न या घटनेवरून वन्य प्रेमींनी व्यक्त केला आहे. या घटनेमध्ये जो दोषी आसल त्याचा तातडीने शोध घेऊन त्यावर कडक कारवाही करावी, अशी मागणी या बहगतील वन प्रेमींकडून होत आहे.