गोंदिया – नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून गोंदिया, गडचिरोलीची ओळख होती. ती ओळख पुसून टाकण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद आमच्याच सरकारने संपवला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
विदर्भ दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे यांनी गोंदियात आयोजित एका कार्यक्रमात हे विधान केले. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती. नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून,
या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम, दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना दीड लाखांवरुन आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. हे सरकार लोकाभिमुख असून शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. राज्य शासनाने धानाला प्रथमच 20 हजार रुपये बोनस दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकेकाळी पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे अतिसंवेदनशील नक्षलवादग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जात होते. त्यावेळी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथील लोक येथे यायला घाबरत होते. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद संपला नाही तर आमच्या सरकारने संपवला आहे असा दावाही शिंदे यावेळी म्हणाले.
आमच्या सरकारने गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद संपवला. प्रसंगी मला गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदीसुद्धा काही काळापर्यंत रहावे लागले होते. कालांतराने सरकार व पोलिसांचा धाक निर्माण करण्याचे काम आम्ही केले, असे शिंदे म्हणाले.