पिंपरी,(प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर ते पिंपरी गाव या दोन्ही गावांना जोडणा-या पवना नदीपात्रावरील उड्डाण पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. एक वर्षाची मुदत संपून गेली तरी पुलाचे काम होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करुन एप्रिलअखेर हे काम पूर्ण करण्याची सूचना ठेकेदाराला दिली आहे.
पिंपळे सौदागर आणि पिंपरी गावाला एकत्र जोडणा-या या समांतर उड्डाणपुलाची लांबी १०० मीटर आणि रुंदी ८ मीटर आहे. तर, पुलाला 3 मीटरचा पदपथ आहे. हा पूल तयार करण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च होणार आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि पुण्यात जाण्यासाठी जुन्या उड्डाणपुलावरुन वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, हा पूल अरुंद असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करवा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
उड्डाण पुलाच्या कामाची मुदत दीड वर्षाची हाेती. जून २०२२ मध्ये ती मुदत संपुष्टात आली आहे. काम संथ गतीने सुरू असल्याने महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने ठेकेदार व्ही. एम. मातेरे कंपनीचे महागाई भाव वाढ देणे बंद केले आहे. शिवाय, हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन दररोज १ हजार रुपये दंड लावण्यात आला होता. ती मुदतही संपल्याने आता दररोज ५ हजार रुपये दंड लावला येत आहे. तरीही काम वेगात होत नसल्याने नाराजी वाढली आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांसमवेत स्वतः पुलाच्या कामाची पाहणी केली आहे. ठेकेदाराला सक्त सूचना करीत एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे.