नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या आर्थिक स्थिती बाबत वेगवेगळे दावे केले असले तरी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी या दाव्याची आकडेवारीच्या आधारे चिरफाड करून हे दावे असत्य ठरवले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, वित्तीय तुटीची आकडेवारी लक्षात घेतली तरी आमचे सरकार आणि विद्यमान सरकार यांच्या कामगिरीची स्थिती लख्खपणे समोर येते.
आमच्या सरकारच्या अगदी शेवटच्या वर्षातील वित्तीय तुटीचे प्रमाण लक्षात घेतले तरी ते जेमतेम ४.५ टक्के इतके होते. पण मोदी सरकारचे हे तुटीचे प्रमाण ५.८ टक्क्यांवर गेले आहे. वित्तीय तुटीचे आकडेच सारी वस्तुस्थिती कथन करीत आहेत. युपीए सरकारच्या सन २००८-०९ या काळात वित्तीय तुटीचे प्रमाण जेमतम २.५ टक्के इतके होते. ते अगदी शेवटच्या काळात वाढत गेले तरी त्याचे प्रमाण केवळ ४.५ टक्के इतकेच होते, असेही चिदंबरम यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
सरकार खराब आर्थिक स्थितीबाबत करोनाचे कारण देत असले तरी आमच्या सरकारच्या काळातही सन २००८-०९ या साली जागतिक आर्थिक मंदी आली होती आणि सन २०१३-१४ या वर्षातही मोठी आर्थिक आव्हानाची स्थिती निर्माण झाली होती याकडेही चिदंबरम यांनी लक्ष वेधले आहे. अर्थशास्त्रात फालतू बाबींना काहीही स्थान नसते असा टोमणाही चिदंबरम यांनी मारला आहे.
दरम्यान, चिदंबरम यांनी अलिकडेच युपीए सरकारच्या दहा वर्षातल्या आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका काढण्याच्या निर्मला सीतारामन यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ही श्वेत पत्रिका निष्पक्ष यंत्रणेकडून काढली गेली पाहिजे. त्याच्याशी विद्यमान सरकारच्या कामगिरीची तुलना करायला आम्हालाही आवडेल असेही त्यांनी म्हटले आहे.