नवी दिल्ली – मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी अलिकडच्या काळात भारताबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्यांबद्दल भारताची माफी मागावी, अशी मागणी मालदीवच्या संसदेमधील विरोधी पक्ष जम्हूरी पक्षाचे नेते गॅसिम इब्राहिम यांनी केली आहे. भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंध अडचणीत आणणारी वक्तव्ये केल्याबद्दल मुइझ्झू यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक माफी मागावी, अशी मागणी इब्राहिम यांनी केली आहे. मुइझ्झू यांनी चीनच्या दौर् यावरून परतल्यानंतर भारताला उद्देशून कोणताही देश मालदीवला धमकावू शकत नाही, असे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी भारताचा मानोल्लेख केला नव्हता. मात्र त्यांचा रोख भारताकडेच होता, हे उघड आहे.
मुइझ्झू यांच्या मंत्रिमंडळातील ३ मंत्र्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनुचित वक्तव्ये केली होती. त्यानंतर अध्यक्ष मुइझ्झू यांनी स्वतःही भारताबद्दल तसेच वक्तव्य केले होते. आम्ही लहान देश असलो, म्हणजे आम्हाला कोणीही धमकावू शकेल, असे नाही, असे मुइझ्झू म्हणाले होते. तसेच भारतावर औषधे आणि वैद्यकीय उपचारांबाबतही अवलंबून राहू नये, असेही मुइझ्झू म्हणाले होते. भारताकडून औषधांची आयात केली जाऊ नये. त्याऐवजी युरोप आणि अमेरिकेकडून औषधांची आयात करण्याच्या पर्यायाची शक्यता तपासावी, असेही मुइझ्झू यांनी सुचवले होते. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील भारताची प्रगती लक्षणीय असल्यामुळे ही कृती व्यवहार्य नसल्याची टीका गॅसिम इब्राहिम यांनी केली आहे.
मुइझ्झू यांच्या चीन धार्जिण्या आणि भारत विरोधी भूमिकेमुळे मालदीवमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीने मुइझ्झू यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची तयारी सुरू केली आहे.
जम्हूरी पार्टीच्या सदस्यांच्या बैठकीनंतर गॅसिम इब्राहिम यांनी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष मुइझ्झू यांनी भारताची माफी मागावी, अशी मागणी केली. भारताबरोबर विनाकारण वाद निर्माण केले गेले आहेत. माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांनी मालदीवमधून बारताला बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली होती. मात्र त्यामुळे मालदीव आणि भारतादरम्यान तणाव निर्माण झाला होता. माजी अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी ही मोहिम सुरू ठेवली नव्हती. मात्र ती मोहिम मुइझ्झू यांनी सुरू ठेवली असल्याची टीकाही गॅसिम इब्राहिम यांनी केली.