Bharat Jodo Nyay Yatra – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ मणिपूरहून होणार आहे. त्यासाठीचा १४ जानेवारी हा मुहूर्त जवळ येऊन ठेपला आहे. मात्र, यात्रेच्या प्रारंभासाठी अद्याप मणिपूर सरकारकडून परवानगी मिळाली नसल्याचे मंगळवारी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी राहुल यांनी भारत जोडो यात्रा काढली. ती लक्षवेधी आणि मोठ्या चर्चेचा विषय ठरली. आता त्या यात्रेच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी राहुल आणि कॉंग्रेसजन सज्ज झाले आहेत. मात्र, यात्रेच्या प्रारंभासाठी कॉंग्रेसला अद्याप परवानगीची प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट झाले. त्याविषयीची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते के.सी.वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कॉंग्रेसच्या मणिपूर शाखेने आठवडाभरापूर्वी परवानगीसाठी मणिपूरच्या मुख्य सचिवांकडे अर्ज सादर केला. आम्ही परवानगी देऊ शकत नाही. संबंधित अर्ज मंजुरीसाठी दिल्लीला पाठवण्यात आला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी मंजुरी देण्याचे काम केंद्र सरकारचे आहे का, असा सवाल त्यांनी केला. रोखण्याचा प्रयत्न झाल्यास यात्रेला अतिरिक्त प्रसिद्धी मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला. कॉंग्रेसच्या यात्रेचा प्रारंभ होणाऱ्या मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे.