World Bank : पाकिस्तान मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथील महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे.पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी ठरले आहे. येथे गरिबांसाठी काहीच नसल्याचे जागतिक बँकेने म्हंटले आहे. पाकिस्तानच्या धोरणाचा फायदा काही लोकांनाच झाला असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
येथे श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी सर्व धोरणे आखली जातात. जागतिक बँकेचे देश संचालक नाजी बेनहसिन यांनी सांगितले की, “हवामान बदलामुळे पाकिस्तानवर वाईट परिणाम झाला आहे. पाकिस्तानने कृषी क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणे सुधारली पाहिजेत यावर बेनहासीन यांनी भर दिला. शेती, अनुदान आणि इतर उणिवा दूर करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल. अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. पाकिस्तानच्या खराब आर्थिक मॉडेलमुळे तो आपल्या सहकारी देशांच्या तुलनेत खूपच मागे पडला आहे.”
यावेळी बेनहासीन यांनी यासाठी काय करणे गरजेचे आहे. हे देखील सांगितले. ते म्हणाले की, “सत्ता आणि प्रभाव असलेले लोक सध्याच्या संकटामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेतील आणि आवश्यक ते करतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या उज्ज्वल, समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. पाकिस्तानमधील करसवलती तातडीने कमी केल्या पाहिजे. श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लादून महसूल मिळायला हवा. पाकिस्तानमधील व्यावसायिक वातावरण सुधारण्याची गरज आहे. लघु उद्योगांसाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरून पाकिस्तानमध्ये रोजगाराच्या संधी वाढू शकतील.”
दरम्यान, पाकिस्तानात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशाचा महागाई दर 40 टक्क्यांच्या वर कायम असून वाढत्या महागाईनं सर्व विक्रम मोडले आहेत. येथे गॅससह खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.