नवी दिल्ली -लोकशाहीवर विश्वास ठेवणारे कुणीच संसदेची सुरक्षा भेदण्याच्या कृत्याचे समर्थन करणार नाही. मात्र, विरोधक अप्रत्यक्षपणे त्या घटनेचे समर्थन करत आहेत. विरोधक त्यांच्या वर्तणुकीमुळे २०२४ यावर्षात आणखी कमी संख्येने विरोधी बाकांवरच राहतील, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी बोलत होते. विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी नववर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. विरोधकांच्या संसदेतील वर्तणुकीमुळे त्यांचे संख्याबळ घटेल. त्याचा लाभ होऊन भाजपचे संख्याबळ वाढेल, असा दावा त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील पराभवामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत.
त्यातून ते संसद सुरक्षा भेदण्याच्या घटनेला राजकीय वळण देऊन कामकाजात अडथळे आणत आहेत, असे त्यांनी म्हटले. मोदींनी भाजप खासदारांना संयम बाळगण्याचे आणि लोकशाही मुल्यांचे पालन करण्याचेही आवाहन केले. संसदेत महत्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. त्यामुळे संसदीय कामकाजात इतर कुणी सहभागी होवो अथवा न होवो; भाजप खासदारांनी सहभागी व्हावे, अशी सूचनाही त्यांनी केली.