नवी दिल्ली – मणिपुरमध्ये गेल्याच आठवड्यात झालेल्या हिंसक प्रकारात पुन्हा तेरा जण ठार झाले आहेत. याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी त्यांनी मणिपूर सरकार आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांना नोटीस जारी केली आहे.
तेंगनौपल जिल्ह्यातील लेइथाओ गावात झालेल्या गोळीबारात हे तेरा जण ठार झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांतील गलथानपणामुळेच हा हिंसाचार झाल्याची बाब लक्षात येते आहे असे या नोटीसीत म्हटले आहे.
मणिपुरात मे महिन्यात जिथे हिंसाचार झाला त्यावेळी जो भाग शांत होता त्या भागातही आता हिंसाचाराचे लोेण पसरले असून ही बाब अधिक चिंताजनक आणि त्रासदायक आहे असे या नोटीशीत मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.
लेईथाओ गावात झालेल्या गोळीबाराची घटना ४ डिसेंबर रोजी घडली आहे. या संबंधात जे वृत्तप्रसिद्ध झाले आहे त्याची दखल घेऊन मानवाधिकार आयोगाने ही नोटीस धाडली आहे.
आयोगाने असे निरीक्षण नोंदवले आहे की मीडिया अहवालातील मजकूर, जर खरा असेल तर, तो मानवी हक्क उल्लंघनाच्या गंभीर प्रकरणाचा मामला आहे आणि ही चिंतेची बाब आहे.या प्रकरणी मुख्य सचिवांनीआणि पोलिस महासंचालकांनी दोन आठवड्यात अहवाल सादर करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
“मणिपूर राज्य आणि तेथील जनतेने आधीच खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे आणि समुदायांमध्ये बंधुभाव वाढवणे हे राज्याचे कर्तव्य आहे. असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.