लाहोर – कारगिलमधील घुसखोरीला विरोध केल्यामुळेच पाकिस्तानचे तत्कालिन लष्कर प्रमुख दिवंगत जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आपल्याला १९९९मध्ये हटवले होते, असा गौप्यस्फोट माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. भारत आणि अन्य शेजारी देशांबरोबर आपल्याला चांगले संबंध हवे असल्याचे त्यांनी या निमित्ताने अधोरेखित केले.
जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आपल्याला १९९३ आणि १९९९ मध्ये का हटवले होते हे सांगितले पाहिजे. कारगिलमधील घुसखोरीला विरोध केल्यामुळेच मुशर्ऱफ यांनी मला हटवले होते. कारगिलमध्ये घुसखोरी होता कामा नये, असे मी म्हटले होते.
नंतर माझेच म्हणणे खरे ठरले होते, असे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांशी बोलताना शरीफ म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून तिन्ही वेळा आपल्याला का हटवले गेले, हे आपल्यालाच माहिती नाही. ही कारणे जाणून घ्यायची आहेत, असेही शरीफ म्हणाले.
आपण पंतप्रधान असताना वाजपेयी आणि मोदी या भारताच्या दोन पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली होती. आपल्या कार्यकाळातच भारत आणि अन्य शेजारी देशांशी पाकिस्तानचे संबंध सुधारले होते. आपल्याला भारताबरोबरचे संबंध सुधारावे लागतील.
तसेच इराण आणि अफगाणिस्तानबरोबरचे संबंधही सुधारावे लागतील. चीनबरोबरचे संबंध अधिक घट्ट करावे लागतील. आपल्या शेजारी देशांच्या आर्थिक प्रगतीच्या तुलनेत पाकिस्तान मागे पडला आहे, याची आपल्याला खंत आहे, असेही शरीफ म्हणाले.
इम्रान खान यांच्यावर टीका करताना अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे देशाची सूत्रे का सोपवली गेली हेच आपल्याला समजले नाही, असेही ते म्हणाले. इम्रान खान यांच्या कार्यकाळात २०१८ ते २०२२ दरम्यान पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली.
मात्र एप्रिल २०२२ मध्ये शाहबाझ शरीफ यांनी सत्ता ताब्यात घेतली आणि देशाला वाचवले, असे शरीफ म्हणाले. आपले सरकार २०१७ मध्ये पाडून देशाचे नुकसान केल्याबद्दल देशाचे माजी लष्कर प्रमुख आणि न्यायाधीशच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.