निघोज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत भारताचे विकसित राष्ट्राचे स्वप्न पूर्ण केले असून, सन २०२४च्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याची ग्वाही सरपंच चित्रा वराळ पाटील यांनी दिली.
विकसित भारत या रथाचा प्रारंभ निघोज ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सरपंच वराळ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ पाटील, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वराळ, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, गोकुळ शिंदे, प्रणव हारदे, रमिज शेख, अरिफभाई शेख, रवी रणसिंग आदी उपस्थित होते.
सरपंच वराळ म्हणाल्या की, मोदी पंतप्रधान काळात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाचा विकास झाला असून, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामीण भागात करोडो रुपयांची विकासकामे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण केले आहे. विकसित भारत या रथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला केंद्र सरकारच्या योजनांची माहिती होणार असून, जनतेने केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच वराळ पाटील यांनी केले आहे. सूत्रसंचालन अस्लमभाई इनामदार यांनी केले. अरिफभाई शेख यांनी आभार मानले.