कोल्हापूर/ पालघर/ मांजरी – गुरुवार पुण्यासाठी ‘अपघातवार’ ठरला. कारण, राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये पुण्यातील दोन कुटुंबांतील सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे कोल्हापूरच्या पुईखडी येथे गोव्यावरून मुंबईला जाणारी एक खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात गोव्याला फिरायला गेलेल्या पुण्यातील विराट गौतम यांच्या कुटुंबातील पत्नी नीलू गौतम (43) मुलगी रिद्धिमा गौतम (17) व मुलगा सार्थक गौतम (13) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसरी घटना ही मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन घाटात घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार घाटातील एका धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या एका टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात झाला. ज्यात पुण्यातील गोडबोले कुटुंबातील हर्षद गोडबोले (42), आनंदी गोडबोले (5) आणि वाहन चालक मिलिंद वैद (43) या तिघांवर काळाने घाला घातला आहे.
मांजरी बुद्रुक येथील 40 फुटी रस्त्यावरील झेड कॉर्नर परिसरात गेल्या वीस वर्षांपासून वास्तव्यास असणारे विराट गौतम हे रविवारी सुट्टीनिमित्त दोन मुले व पत्नीसह गोव्याला फिरायला गेले होते. दरम्यान, बुधवारी रात्री आठ वाजता ते खासगी बसने गोव्यावरून माघारी निघाले. मात्र, मध्यरात्री दोन वाजता कोल्हापूरच्या पुईखडी येथे पोहोचली असता अचानक ही बस उलटली. या बसमध्ये जवळपास 24 प्रवासी होते. ज्यातील पाच जण जखमी तर अन्य 16 प्रवासी सुखरूप आहेत.
निलू सामाजिक कार्यात अग्रेसर
मांजरी भागात निलू गौतम या “मदरमेरी’ हायस्कूलच्या माध्यमातून गरीब असलेल्या सुमारे दोनशे मुलां-मुलींना मोफत शिक्षण देत होत्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, शाळेचे शैक्षणिक साहित्य विनाशुल्क पुरवणे व त्यांना शिकवण्यात त्यांचा सतत पुढाकार असायचा. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून निलू यांचे पती विराट यांच्या मदतीने हे शैक्षणिक कार्य चालू होते. त्यामुळे, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर विराट गौतम यांचा धातुपासून मूर्ती बानवण्याचा व्यवसाय आहे.
चिमुकल्या आनंदीच्या मृत्यूमुळे हळहळ
मेंढवन घाटातील अपघातात हर्षदा गोडबोले (वय 37), अद्वैत गोडबोले (वय 12) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, गोडबोले कुटुंबीयांच्या संपूर्ण कारचा चुराडा झाला. मृतांमध्ये पाच वर्षीय आनंदी गोडबोले या चिमुकलीचा समावेश असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.