खासदार रणजितसिंह; तातडीने मार्ग काढण्याची राज्य सरकारची भूमिका
फलटण – कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी तातडीने मार्ग काढण्याच्या भूमिकेत राज्य सरकार आहे. आरक्षणाचा हा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत राजकीय कार्यक्रम करणार नाही. योग्य वेळी योग्य भूमिका घेण्यात मी कमी पङणार नाही, अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी फलटण येथे सुरु असलेल्या बेमुदत आणि साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी रविवारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आंदोलकांची भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाची भूमिका समजून घ्यावी. कोट्यवधींच्या संख्येने असलेला मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत चालला आहे. आमचे मायबाप सरकार आहे. सरकारला प्रश्न विचारायचा नाही तर मग कुणाला विचारायचा?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाची भूमिका समजून घेतली पाहिजेत. कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मराठा समाजास देण्यासाठी तातडीने मार्ग काढण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. हा विषय मार्गी लागेपर्यंत राजकीय कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारणार नाही. मी तुमच्याबरोबर समरस आहे.