मुंबई – सूरत हे अनेक वर्षांपासून हिरे व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. सुरतमधील हिरे आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. पण हिरे परदेशात निर्यात करण्यासाठी सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्याने कालांतराने हा व्यवसाय मुंबईत आला.
ज्यानंतर सुरतमध्ये तयार करण्यात येणारे हिरे हे मुंबईतून परदेशात निर्यात केले जाऊ लागले. पण आता मुंबईत असलेले सर्वच हिरे व्यापारांचे कार्यालय हे लवकरच बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी मिळून सुरतमध्ये अंदाजे 3 हजार 400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार करण्यात आले आहे. सूरत डायमंड बुर्स असे या केंद्राला नाव देण्यात आले आहे.
त्यामुळे जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र असलेल्या या इमारतीने अमेरिकेतील पेंटागॉन इमारतीला मागे टाकल्याचे बोलले जात आहे. काही वर्षांपूर्वी अनेक हिरे व्यापारी हे हिरे व्यवसायाच्या कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले.
पण आता मात्र, सुरतमध्येच सर्वात मोठे डायमंड हब तयार करण्यात आल्याने या व्यापाऱ्यांनी आपला मुंबईतील बोऱ्या बिस्तारा गुंडाळून पुन्हा सूरतची वाट धरली आहे. सुरतमधील हिरे व्यवसायामुळे हजारो लोकांना काम मिळाले आहे.
जे हिरे व्यापारी मुंबईतून हिऱ्यांचा व्यापार करत होते, परंतु राहायला मात्र सूरत येथे होते. त्यामुळे त्यांना ये-जा करणे अत्यंत त्रासदायक ठरत होते. पण आता मात्र सुरतमध्ये बांधण्यात आलेल्या डायमंड बूर्समुळे सुरतमधील हिरे व्यापाऱ्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. पण यामुळे मात्र महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे.