‘आप’चा इशारा : स्मशानभूमी दुरुस्तीची मागणी
येरवडा – विश्रांतवाडी प्रभाग क्र.1 मधील कळस गावातील स्माशानभुमीची मोठी दुरवस्था झाली आहे. गेली दीड वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज असुनही येथील स्माशानभूमीची दुरूस्ती, देखभाल झालेली नाही. याच कारणातून ही स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र असून या स्मशानभुमीची दुरुस्ती करावी, अन्यथा क्षेत्रीय कार्यालयावर तिरडी मोर्चा आणला जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीच्यावतीने देण्यात आला आहे.
कळस गावातील स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक मागील अनेक दिवसांपासून करीत आहे. मागील पाच वर्षांत लोकप्रतिनिधींकडून याठिकाणी लाखो रुपयांची कामे केली गेली असतानाही केवळ महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. याकडे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचेही दुर्लक्ष आहे.
स्माशानभूमीतील दहन करणाऱ्या जागेवरची जाळी तुटलेली असल्याने याठिकाणी अंत्यसंस्कार करता येत नाहीत. या जागेवर लाकडे रचता येत नाहीत, अनेकदा मृतदेह खाली घसरतो. स्मशानभुमीत मद्यपींचा वावर असतो. पालिकेचा सुरक्षारक्षक नसल्याने येथील रुमचे दरवाजे कोणीतरी तोडले आहेत. येथे पाणी, वीजेची व्यवस्था नसल्याने अनेकवेळा मृतदेहावर अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागतात.
येथील सीसीटिव्ही बंद आहेत.
त्यामुळे याठिकाणी जुगार आणि मटकेच्या धंदे चालविले जातात. विश्रांतवाडी पोलिसांनाही याबाबत निवेदने देवुनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथील स्मशानभूमीची लवकरात लवकर दुरुस्ती करुन कायम सुरक्षारक्षक नेमावेत, यासाठी लागणारा निधी पालिकेने उपलब्ध करून द्यावा, यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घ्यावी, अशी मागणी आम आद पक्षाकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.
कळस गावातील स्माशानभुमीच्या दुरवस्थेबाबत महापालिका प्रशासनाकडे संपर्क साधून तशी माहिती दिली होती. प्रशासकांकडून याची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
– अमित म्हस्के, युवक अध्यक्ष, आम आदमी पक्ष