पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्रं 30-32 येथे आर्थिक दुर्बल गट, अल्प उत्पन्न गटासाठी गृह प्रकल्प योजना राबविली आहे. लाभार्थ्यांनी बॅंकेकडून कर्ज घेऊन संपूर्ण अधिमूल्य भरले आहे. मात्र, अधिमूल्य भरून पाच महिन्याचा कालावधी झाला आहे. त्यानंतरही लाभार्थ्यांना हक्काच्या घरापासून आणि गाळ्यांचा ताबा देण्यापासून वंचित ठेवले आहे. लाभार्थ्यांना दसऱ्यापर्यंत लाभ द्यावा, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य सुरेश वाडकर यांनी केली आहे.
याबाबत वाडकर यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष राहूल महिवाल यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत पेठ क्रं 30-32 येथे आर्थिक दुर्बल गट, अल्प उत्पन्न गटासाठी गृह प्रकल्प योजना राबविली. वर्तमान पत्रात जाहिरात देवून पात्र नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवून लॉटरीद्वारे लाभार्थी निवडण्यात आले. सदनिकांना धारकांना अधिमूल्य भरण्यासाठी पत्रही देण्यात आली.
त्यानुसार लाभार्थ्यांनी बॅंकेकडून कर्ज घेवून संपूर्ण अधिमूल्य भरले आहे. मात्र, अधिमूल्य भरून पाच महिन्याचा कालावधी झाला आहे. त्यानंतरही लाभार्थ्यांसोबत अद्याप करारनामा करण्यात आलेला नाही. त्यांना सदनिकेचा ताबा देखील दिलेला नाही. लाभार्थ्यांना बॅंकेचे हप्ते सुरू असून घराचे भाडे देखील भरावे लागत आहे.
त्यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्याचबरोबर याच योजनेतील गाळे हे ई लिलावाद्वारे विक्री करण्यात आले आहेत. सर्वोच्च बोलीधारकासमवेत भाडेपट्टाही करण्यात आला. मात्र, त्यांनाही अद्याप गाळ्यांचा ताबा देण्यात आलेला नाही. या सर्व लाभार्थ्यांना दसऱ्यापर्यंत करारनामा करून सदनिका, गाळ्यांचा ताबा द्यावा, अशी मागणी वाडकर यांनी केली आहे.