– मधुरा धायगुडे
भावसंगीतातील हिरवा चाफा म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या सुमन कल्याणपूर. रेशमी मखमली सात्विक आवाज ही त्यांची खरी ओळख.
स्पर्धेच्या युगात विश्वास, कृतज्ञता, आदर, आदर्श मूल्ये यांना अर्थ नसतोच का असे वाटते. सुमनताईंनी असंख्य अशा अडथळ्यांना पार करत आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली.
सुमनताईंचा आवाज आजही दरवळतोय चाफ्यासारखा. कुणाविषयी बोलताना फक्त चांगल्याच आठवणी जपाव्यात, असे म्हणत जगण्याविषयीचे केवढे तत्त्वज्ञान सांगून जातात. त्यातून खुलणारा त्यांचा आवाज सात्विक अनुभूती देत राहतो.
आपल्या मखमली आवाजात त्यांनी अनेक गाणी गायिली. त्यांचा कानाला तृप्त करणारा मधुर स्वर म्हणजे जणू अमृतशिंपणच. गढूळ वातावरणापासून स्वतःला अलिप्त ठेवत त्यांची स्वरसाधना चालू आहे. आजही घराघरात मनामनात त्यांचे स्वर अमृतनुभव देत आहेत.
एक एक गीत सोने करून टाकले. शब्दप्रधान भावसंगीत त्यांनी भावनेने पोहोचवले.
गीतातील शब्द मोत्याच्या माळेसारखे तरलता देऊन जातात. गाण्यातून जगण्याचे आधार नकळत मिळत जातात अशी भावगीते त्यांनी गयिली. यात शब्द शब्द जपूनी ठेव, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, घाल घाल पिंगा वाऱ्या सारखी भावगीते मनात घर करून जातात. जगण्याचे वास्तव दर्शवतात.
दशरथ पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शनातील केतकीच्या बनी, रिमझिम झरती, केशवा माधवा सारखी अनेक गीते त्यांनी गायली. त्यात लागलेला त्यांचा स्वर आत्म्याशी तादातम्य साधतो. गाण्याचे शब्द, संगीत, त्यातील भाव याची नेमकी जाणीव त्यांना होती म्हणूनच ती अजरामर आहेत.
कायम स्वतःच्या आवाजात त्या गात राहिल्या, कुणाची कॉपी होण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. म्हणूनच त्या सुमन कल्याणपूर राहिल्या, ही अजून एक त्यांची खासियत. सहज सुलभ शब्दांना सजवत ते सुगम करतात सुमनताई. आपलं वेगळेपण जपत त्यांनी आपलं विश्व रसिकांच्या मनात निर्माण केलं.