मुंबई – बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) अभिनयासोबतच त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. बॉलिवूडमधील चित्रपटांबाबत ते नेहमीच बेधडकपणे विधान करताना दिसतात. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये RRR आणि ‘पुष्पा’ या सुपरहिट ठरलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांवर टीका केली आहे. याशिवाय त्यांनी काही बॉलीवूड चित्रपटांवर देखील निशाणा साधला आहे.
नसीरुद्दीन शाह म्हणाले की, “आपली तरुण पिढी ही अधिक विकसित आणि समजूतदार आहे. मला आपल्या तरुण पिढीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र RRR आणि पुष्पासारखे चित्रपट पाहून रोमांचशिवाय आणखी काय मिळतं असा प्रश्न मला पडतो. मी RRR पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र मी पाहू शकलो नाही. मी अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट देखील पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र तोसुद्धा मी पाहू शकलो नाही. RRR आणि पुष्पासारखे चित्रपट पाहण्यासाठी मी कधीच जाणार नाही. ”
याशिवाय शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाबाबत ते म्हणाले की, “पुरुषांमध्ये हल्ली असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. म्हणून अति-पुरुषत्वावर अधिक भर दिला जात आहे. मात्र त्याचसोबत ‘अ वेडनस्डे’सारखे चित्रपटसुद्धा यशस्वी ठरत आहेत, ज्यामध्ये अतिपुरुषवादी नायक नसतो.” तर मणिरत्नम हे अतिशय सक्षम चित्रपट निर्माते असून त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नसल्यामुळे तो ‘पोनियिन सेल्वन’ पाहण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वी नसीरुद्दीन शाह यांनी ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘गदर 2’ चित्रपटावरही टीका केली होती. “द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहित आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही. पण हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की असं असूनही ही लोकं चित्रपटांद्वारे त्यांच्या कथा सांगण्याचं काम थांबवत नाहीत”, असंही शाह म्हणाले होते.