जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
योगेश कणसे
लोणी देवकर –इंदापूर तालुक्यात अनेक भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील स्थानिक शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. शेताला पाणी मिळत नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहे.
इंदापूरच्या मध्य भागातील बरेचशे पशुपालक शेळ्या मेंढ्या, जनावरांच्या पाणी आणि चाऱ्यासाठी उजनी जलाशयाची जवळीक साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बळपुडी, कौठळी, कचरवाडी व निमगाव केतकी परिसरातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या व जनावरांच्या चाऱ्या व पाण्यासाठी उजनीकडे पाणलोट क्षेत्राकडे येत आहेत.
पाण्यासाठी त्यांना रोजचा 5 किमीहून जास्तीचा पायी प्रवास करावा लागत आहे. या पाणीप्रवासासाठी सकाळी लवकर घर सोडून रात्री उशिरा घरी परतण्याची वेळ पशुपालक शेतकऱ्यांवर आली आहे. रोजचा हा प्रवास टाळण्यासाठी काही पशुपालक उजनी परिसरातील वरकुटे बु, करेवाडी, भावडी, आगोती, गंगावळण व चांडगाव आदी परिसरात स्थानिक शेतकऱ्यांच्या मोकळ्या शेतात राहत आहेत.
या वेळी मान्सूनने दडी मारल्याने पशुपालकांचा अंत पाहणारा आहे. त्यामुळे मेंढपाळ मेंढ्या जनावरांसह चारा उपलब्ध होईल, अशा उजनी परिसरात मिळेल तिथे असेल त्या परिस्थितीत राहायचा तयारीत आहेत. पाऊस नाही झाला तर घरापासून दूर आलेल्या पशुपालकांसह लहान मुलांच्या शाळेवर परिणाम होऊ शकतो.
दुष्काळामुळे जनावरे सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे; परंतु शेळ्या मेंढ्या विकायच्या ठरवल्या तरी दुष्काळामुळे जनावरे अत्यल्प किमतीत जात आहेत. जनावरांच्या चाऱ्या व पाण्यासाठी भटकंती अटळ आहे.
चारा डेपो सुरू करावेत
दुष्काळाची तीव्रता अजून अशीच जाणवणार आहे. त्यामुळे भविष्यात अजून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे. त्यामुळे शासनाने किमान जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची सोय करावी अशी अपेक्षा पशुपालकांकडून व्यक्त केली जात आहे. जनावरांच्या खाद्यासाठी त्वरित चारा डेपो सुरु करावेत हि मागणी जोर धरू लागली आहे.