मुंबई – मणिपूर जळत असताना, करोना महामारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावले नाही, अशा शब्दांत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच देश चालविण्याचा हा मार्ग नसून, आपण हळूहळू हुकूमशाहीकडे जात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
मुंबईतील ग्रॅंड हयातमध्ये “इंडिया’च्या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे. या बैठकीसाठी मुंबईत 28 राजकीय पक्षांचे 63 प्रमुख नेते उपस्थित राहिलेले आहेत. इंडियाच्या दोनदिवसीय बैठकीनंतर इंडियाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, केंद्र सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना न बोलविता संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. पण मोदी सरकारने मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलविले नाही. करोना काळातदेखील अधिवेशन बोलविले नाही. चीन देशात घुसखोरी करत आहे. त्यासाठीदेखील मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलविले नाही.
सर्वसामान्य लोक नोटबंदीच्या वेळीही खूप त्रासलेले होते. तेव्हासुद्धा मोदींनी विषेश अधिवेशन बोलविले नाही. जेव्हा जेव्हा देश संकटात होता, तेव्हा तेव्हा कधीच मोदींनी विशेष अधिवेशन बोलविले नाही. पण आता विशेष अधिवेशन का बोलविले, मला माहिती नाही, असे म्हणत टीका केली.