पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांविषयी पत्रव्यवहाराची औपचारिकता इंग्लंडकडून पूर्ण झाली आहे. ही वाघनखे भारताकडे सोपविण्यास ब्रिटनच्या संसदेने मान्यता दिली आहे. मात्र, वाघनखे व जगदंब तलवार एकत्रितरीत्या आणण्याचा सरकार प्रयत्नशील आहे. याबाबत काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात आणता येणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंबेगाव (बु.) येथील “शिवसृष्टी’ला मुनगंटीवार यांनी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते. यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक दिनाचे 350 वे वर्ष असून, या वर्षभरात केंद्र सरकार, रिझर्व बॅंक ऑफ इंडिया यांच्या मदतीने छत्रपती शिवरायांच्या काळातील “होन’ हे चलनी नाणे सोने, चांदी, तांब्याच्या धातूत सादर करीत स्मरणिका म्हणून प्रकाशित करणार आहे.
याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा झाली असून तीन धातूंचे शिवकालीन होन नागरिकांना स्मरणिका म्हणून खरेदी करता येईल. शिवराज्याभिषेक दिनाला 350 वर्षे लागले असून संपूर्ण वर्षभर राज्यासह देशात व विविध देशांत अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
शिवकाळातील इतिहासाचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीकोनातून जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्याचा सरकारचा मानस आहे. बिहार, गुजरातप्रमाणे भव्यदिव्य स्वरुपात मुंबईत 30 एकर जागेत ते उभारण्यासाठी सुयोग्य जागेचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिलेला आहे. त्याबाबत शंका घेण्याचे कारण नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.