लखनौ – राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, तो भाजपच्या अहंकाराचाच पराभव आहे अशी प्रतिक्रीया समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिली आहे.
या निर्णयावर प्रतिक्रीया देताना त्यांनी म्हटले आहे की, न्याय व्यवस्थेवर आणि लोकशाहीवरील लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण झाल्याचा मला आनंद आहे. हा भारतीय जनता पक्षाच्या अहंकाराचा आणि लोकांकडे तुच्छतेने पाहण्याच्या त्यांच्या राजकारणाचा पराभव आहे,असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हरियाणा आणि मणिपूर हिंसाचाराच्या मुद्दावरून भाजपवर टीका करून ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला केवळ धर्माचा खोटा वापर करून सत्ता मिळवायची आहे. पण या दोन्ही राज्यांतील सलोखा आणि शांतता पूर्ववत व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मणिपूरमध्ये जे काही घडले त्यामुळे संपूर्ण देशाचे नाव बदनाम झाले त्याची सरकारने जराही फिकीर केलेली नाही असे ते म्हणाले.