मुंबई :- राज्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे.
हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. तसेच पावसाने ओढ दिलेल्या भागातील पिकांना जीवदान मिळणार आहे.
पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसीटी एक्सप्रेस, डेक्कन एक्स्प्रेस तसेच इंद्रायणी एक्सप्रेस या 5 रेल्वे गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या. तसेच, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी उपग्रह छायाचित्र जारी केले आहे. त्यात विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यभरावर मान्सूनचे ढग जमा झाल्याचे दिसत आहे. त्यानुसार आगामी दोन, तीन दिवस कोकणात विशेषत: रायगड, सिंधूदुर्ग येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच पश्चिम मराठवाड्यातील काही भाग व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाण्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खानदेशातही सरी…
गेल्या दोन दिवसांत खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा…
मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा शिडकावा झाला आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना आधार मिळाला. मात्र, अनेक काही भागात अजूनही पाऊस नसल्याने पिके संकटात आली आहेत. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती तयार झाली आहे. पेरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे.
विदर्भात जोरदार पाऊस…
पूर्व विदर्भातील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पश्चिम विदर्भातील रिसोड, बारव्हा, मुरमाडी, सालेकसा, साखरीतोला, देवरी, चिंचगड, सिंदीबीरी, कारोडी, नावेगावबंध, बोधगावदेवी, अर्जुनीमोरगाव, महागाव, कशोरी, घोटनगाव, दाबा, ब्रम्हपुरी, अन्हेर नावरगाव, चौगुण, सावळी, पाथरी या भागात मध्यम पाऊस पडला. पूर्व विदर्भातील धानोरा, घोट, पुराडा, गडचिरोली या भागातही चांगला पाऊस पडला. त्यामुळे या भागातील धान पिकांना चांगलाच फायदा झाला