महाड – राज्यातील विविध भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांचे पाणी गावात शिरले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रायगडमध्येही पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. महाड शहरातील बाजार पेठेत अनेक दुकानात आणि बैठ्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीलाही पूर आला आहे. नदीच्या शेजारी असलेल्या आपटा गावात पाणी शिरलं असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. दोन दिवसांपासून गावात पुराचं पाणी शिरल्याने गावातील जनजीवन विस्कळीत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आज जिकडेतिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे कर्जत, अंबरनाथ, बदलापूर येथून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा उभ्या आहेत. वाहतूक कधी सुरळीत होईल, याबाबत काहीच निश्चित अशी माहिती नाही. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेखाली उतरून रेल्वे रुळाच्या मार्गाने आपल्या घरी निघाले आहेत.
कल्याण-कसारा रेल्वे वाहतूकही विस्कळीत
कल्याण-कसारा मार्गावरील लोकल वाहतूकदेखील बंद पडली आहे. कल्याण स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झालीय. कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवर गाड्या उभ्या आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकांजवळ एकामागे एक अशा अनेक गाड्या उभ्या आहेत. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेला जाणारी वाहतूकही प्रचंड संत गतीने सुरु आहे.