कधी नव्हे तो कॉंग्रेस पक्ष हा चांगलाच सक्रिय झाला असून, राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद मिटवण्यात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना यश आले आहे. “मागचे सगळे विसरून पुढे जा, असा सल्ला खर्गे यांनी मला दिला होता आणि तो माझ्यासाठी आदेशच आहे. निवडणुकीतील यशासाठी सामूहिक नेतृत्व हाच एकमेव मार्ग आहे’, असे उद्गार काढून पायलट यांनी गेहलोत यांच्याबरोबर असलेले मतभेद मिटवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राजस्थानात नजीकच्या भविष्यकाळात निवडणुका असल्यामुळे ही पावले उचलण्यात आली. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्येही विधानसभा निवडणुका असून, मुख्यमंत्रिपदाचे एक दावेदार टी. एस. सिंगदेव यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी सिंगदेव यांची स्पर्धा असून, अडीच वर्षांनंतर आपल्याला मुख्यमंत्री करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पण त्याची पूर्तता करण्यात आली नाही, ही त्यांची तक्रार होती. आता निदान उपमुख्यमंत्रिपद तरी मिळाल्यामुळे ते समाधानी आहेत. छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार दीपक बैज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष मोहन मरकाम यांनी आपल्याच सरकारवर विधानसभेत काही आरोप केले होते. मात्र, ते पुरेसे प्रभावी ठरले नसल्यामुळे त्यांना दूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक गट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारबरोबर गेल्यामुळे कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीमुळे महाराष्ट्रात कॉंग्रेसला पक्षविस्ताराची उत्तम संधी निर्माण झाली आहे. म्हणूनच खर्गे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत गेल्या मंगळवारी प्रदेश कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. कॉंग्रेसने स्वबळाचा नारा न देता, महाविकास आघाडीतूनच लोकसभेची निवडणूक लढवणे शहाणपणाचे ठरेल, असा मुद्दा या बैठकीत सार्थपणे मांडण्यात आला. शेजारच्या कर्नाटकात कॉंग्रेसला उत्तम यश मिळाल्यामुळे पक्षात उत्साह संचारला आहे; परंतु दिल्लीतील या बैठकीत अनेक नेत्यांनी परस्परांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेत नाहीत. त्यांचा मनमानी कारभार योग्य नाही, अशी टीकाही केली. तर काहीजणांना मी नको असल्याने ते सतत दिल्लीत येऊन माझ्याविरुद्ध तक्रारी करतात आणि पत्रकारांनाही पक्षांतर्गतच भांडणांची माहिती देतात, अशी तक्रार पटोले यांनी केली. तेव्हा आपसांतील मतभेद मिटवून कर्नाटकप्रमाणेच लोकसभेची निवडणूक लढवा. बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी खर्गे यांनी दिली.
खर्गे यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत कॉंग्रेसला यश मिळाले. मात्र, हे केवळ खर्गे यांचे यश नसून, या दोन्ही राज्यांतील संघटनेलाही श्रेय द्यावे लागेल. त्याचप्रमाणे राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. तसेच माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे मार्गदर्शनही खर्गे यांना मिळत आहे. सोनिया गांधी आता प्रकृतीमुळे पूर्वीइतक्या सक्रिय नसल्या, तरीदेखील पडद्यामागून त्या पक्षासाठी मोलाचे कार्य करत असल्याचे सांगण्यात येते.
पाटणा येथील विरोधी पक्षांच्या बैठकीत कॉंग्रेसने संपूर्ण सहकार्याची व समन्वयाची भूमिका घ्यावी, हा सोनियाजींचाच आग्रह होता. आता 17 व 18 जुलै रोजी विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरू येथे होणार असून, त्यास स्वतः सोनिया गांधी हजर राहणार आहेत. बहुतेक सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सोनियाजींचे सौहार्दाचे संबंध आहेत. या बैठकीचे निमंत्रक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, सोनियाजींनी बंगळुरूला हजेरी लावावी असा आग्रह धरला होता. सोनियाजी उपस्थित राहिल्यास, विरोधी ऐक्याचे नेतृत्व कदाचित कॉंग्रेसकडेच जाईल, याचे संकेत मिळतील. तृणमूल कॉंग्रेस, आम आदमी पक्ष या पक्षांचे कॉंग्रेसशी बरे संबंध नाहीत. शरद पवार हे सर्वार्थाने अनुभवी नेते असले, तरीदेखील आताच्या नव्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोनियाजी याच उत्तम नेतृत्व देऊ शकतात. शिवाय सोनियाजी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (ती जरी नावालाच असली, तरी) अध्यक्षा आहेतच.ज्या नेत्यांना राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यास अडचण वाटते, त्यांना सोनियाजींबाबत असे वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोनियाजी तुलनेने राजकारणात नवीन होत्या तेव्हा, म्हणजे 2004 साली त्यांनी विविध पक्षांना एकत्र करून संपुआची मोट बांधली होती. करुणानिधी, अटलबिहारी वाजपेयी, मायावती, मुलायमसिंग यांच्याशी त्यांनी उत्तम संबंध प्रस्थापित केले होते आणि केव्हाही फोन करून त्या या नेत्यांशी बोलत असत व त्यांच्याशी सल्लामसलत करत असत. अहमद पटेल हे त्यांचे राजकीय सल्लागार होते आणि पुलक चटर्जी हे त्यांच्या जवळचे विश्वासू सनदी अधिकारी होते. त्यांच्यामार्फत त्या आपल्या कल्पना राबवण्यात यशस्वी झाल्या होत्या.
डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यात कधीही संघर्ष झाला नाही आणि 2004 ते 2009 या पहिल्या टप्प्यात तर सरकार उत्तमपणे चालले होते. इंडिया शायनिंगचा प्रचार सुरू असूनही, 2004 मध्ये सोनियाजींनी भाजपचा पराभव केला. भाजपच्या विरोधात सोनिया गांधींनी सातत्याने खंबीर व आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या तुलनेत अनेक ज्येष्ठ कॉंग्रेस नेतेही भाजपशी जमवून घेणारे निघाले! एकेकाळी इंदिरा गांधींनी कर्नाटकातील चिकमंगळूर येथून निवडणूक लढवली होती आणि सोनियाजींनी बेल्लारीमधून. त्यामुळे कर्नाटकशी गांधी घराण्याचे वेगळेच खास नाते आहे. बंगळुरूत एकूण 24 पक्ष सहभागी होणार असून, केरळ कॉंग्रेस (एम), केरळ कॉंग्रेस (जे), आययूएमएल, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक तसेच व्हीसीके, एमडीएमके आणि केडीएमके हे तमिळनाडूतील पक्ष नव्याने उपस्थिती लावणार आहेत. विरोधी एकजुटीच्या कल्पनेची भाजपने टिंगलटवाळी सुरू केली असली, तरी देशातील लोकशाही चैतन्यशील राहण्याच्या दृष्टीने विरोधी आवाजही बुलंद असण्याची आवश्यकता आहे. सोनिया गांधींना ना पंतप्रधान व्हायचे आहे, ना आणखी काही. मात्र मोदीविरोधी आघाडीला समर्थ बनवण्यासाठी त्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकेल.