मुंबई – ‘आरआरआर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर काही दिवसांपूर्वी ‘आरआरआर’ चा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन एसएस राजामौली करणार नसल्याचे म्हंटले जात आहे. ‘आरआरआर 2’ संदर्भात लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले की, “राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या सिनेमाच्या सीक्वेलवर काम सुरू झाले आहे. हॉलिवूड सिनेमांप्रमाणे या सिनेमाची निर्मिती केली जाणार असून हॉलिवूडचे निर्माते या सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा एसएस राजामौली किंवा आणखी कोणी दिग्दर्शत करू शकतो”. या विधानानंतर आता या सिनेमाचे दिग्दर्शन एसएस राजामौली करणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजामौली यांचे वडील आणि पटकथा लेखक विजयेंद्र प्रसाद हे सीक्वेलची कथा लिहणार आहेत. दरम्यान, RRR चित्रपटाचे निर्माते राजामौली ते अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि संगीतकार एमएम कीरावानी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये आहेत. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनीसुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच 100 कोटींचा टप्पा पार केला होता. 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने जगभरात 1200 कोटींची कमाई केली होती.
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ यासारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाच्या भव्य दिव्य सेटने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या सुपरहिट चित्रपटानंतर एसएस राजामौली लवकरच ‘महाभारत’ या ड्रीम प्रोजेक्टवरही काम सुरू करणार आहेत.