मुंबई – अजित पवार सत्तेत सामील झाल्याने हे सरकार अधिक मजबूत झाले आहे, त्यांच्या येण्यामुळे शिवसेनेत कुणीही नाराज नाही,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. तर सरकार पडणार या केवळ अफवा असून माझ्या मागे मोदी-शाहांची ताकद असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरुन राजीनामा देणार असल्याच्याही बातम्या येत होत्या. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे.
आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सोबत घ्यायचे ठरवले. गेल्या वर्षभरात झालेला विकास पाहून पवार सोबत आले आहेत. आमच्यात कुणीही नाराज नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत.
राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या काही बातम्या सातत्याने येत आहेत. त्यावर बुधवारी राज्याचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले होते. यावर शिंदे म्हणाले की, ज्या दिवसापासून या सरकारचा शपथविधी झाला त्या दिवसापासून सरकार पडणार या अफवा सुरू आहेत.
आतातर या अफवांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ आहे. त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी आपले जळते घर पाहावे
अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केले असून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्यावर होणाऱ्या टीकेला काहीही अर्थ नाही. विरोधकांनी पहिला आपल्या जळत्या घराकडे पाहावे, आत्मपरीक्षण करावे. गेल्या वर्षभरात जे काही चांगले निर्णय घेतले ते त्यांना बघवत नाही. लोक सर्व पाहत आहेत, त्यामुळे लोकांना माहिती आहे.