सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका वाजवलेला आहे. भारतातील 142 कोटी जनतेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या अनेक सर्वसमावेशक विकास योजना आणि सुशासन यामुळे सर्वसामान्यांचे जीवन उंचावण्यास मदत झाली आहे. दहा वर्षांपूर्वी अनेक घोटाळ्यांमुळे अस्वस्थ झालेला माणूस आता शांतपणे श्वास घेतो आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या वतीने मोदी @ ९ या कार्यक्रमात आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.हा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, लोकसभा प्रभारी अतुल भोसले, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस भरत पाटील, उपाध्यक्ष विक्रांत पावस्कर, भाजपा महिला आघाडीच्या सुवर्णा पाटील, प्रियाताई शिंदे भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले देशाची सत्ता 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी मिळवली त्यापूर्वीच्या काळात घोटाळ्यांच्या आकड्यांनी सर्वसामान्य माणसे अस्वस्थ झाली होती. देशाची सत्ता मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी मानत विकासाच्या अनेक योजना आणि सुशासन राबवले त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. या मदतीमुळे आज सर्वसामान्य जनता मोदींसोबत आहे. जगातही भारताच्या कर्तुत्वाचा डंका मोदींमुळेच वाजत आहे.
मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांचे शाही स्वागत करण्यात आले त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि कोणताही जागतिक महत्त्वपूर्ण निर्णय यामध्ये असलेला मोदींचा सहभाग यामध्येच विरोधकांना मोदींची अडचण वाटत असून सर्व विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात एकवटलेले आहेत. मात्र सर्वसामान्य माणूस हा मोदींच्या बाजूनेच उभा आहे आणि याची प्रचिती येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन परिस्थितीमध्ये लाखो करोडोच्या घोटाळ्याचे आकडे बाहेर येत होते तेव्हा नागरिक संभ्रमित झाले होते भाजपच्या माध्यमातून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना आता नऊ वर्षानंतर सर्वसामान्यांनी मनापासून स्वीकारलेले आहे असं पाटील यावेळी म्हणाले.
जगभरामध्ये लॉकडाऊनला विरोध झाला होता मात्र जनतेने मोदींच्या निर्णयाला भरभरून साथ दिली. हाच विश्वास मोदींनी पुढे वाढविला देश कोविड मधून मोदींमुळे वाचला देशातील जनतेला या साथीतून वाचवण्यासाठी लसीकरणाची व्यापक म्हणून राबवण्यात आली. जगात नंबर एकची लसीकरण भारतामध्ये झाले आहे. कोविडच्या काळात दोन आणि बुस्टर अशा 200 कोटी पेक्षा जास्त लस्सी देशभरातील नागरिकांना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळेच कोविडच्या त्रासापासून आपला देश वाचलेला आहे. सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम मोदी यांनी केले आहे. त्यामुळे छत्रपतींच्या सातारा जिल्ह्यातून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा खासदार आणि सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार सातारकरांनी निवडून द्यावेत असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले माझ्या पाठीमागे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रवीण दरेकर हे भक्कमपणे उभे आहेत सातारा जावली मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून दिले जातील आणि जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष कसा होईल यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सामूहिक रित्या संकल्प केलेला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले, दिल्लीमध्ये साताऱ्याचा आणि म्हाड्याचा खासदार भाजपचा जावा ही प्रदेश कार्यकारिणीची इच्छा आहे. त्यासाठी मोदी नाईन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी मनापासून काम करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये दीड हजाराहून अधिक बूथ रचना अस्तित्वात असून त्याचे काम सक्षमपणे सुरू आहेत. मोदींनी ज्या विकास योजना राबवलेल्या आहेत. त्यामधून सर्वसामान्यांना विश्वास आहे व जागतिक पातळीवर भारताची मान ही उंचावलेली आहे. त्यामुळे यापुढे सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही संकल्पना मागे पडली असून यापुढे सातारा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल असा आमचा विश्वास आहे.
जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने उपस्थित मान्यवर चंद्रकांत पाटील व प्रवीण दरेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस विठ्ठल बलशेतवार यांनी केले. सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी केले