नवी दिल्ली – ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुमारे 290 लोकांचा मृत्यू झाला. तर शेकडो जण जखमी झाले. तसेच अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. डीएनए चाचणीही झाली, मात्र, घटनेला 18 दिवस उलटूनही अखिलेशचा मृतदेह हाती लागलेला नाही.
अखिलेश याचे वडील रामगुलाम राय यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. चार बहिणींमध्ये अखिलेश हा एकुलता एक भाऊ होता. दोन बहिणींची कशीतरी लग्नं झाली, तर दोन लहान बहिणी आणि वृद्ध आईची जबाबदारी 15 वर्षांच्या अखिलेशवर होती. या जबाबदाऱ्या पार पाडत तो हैदराबादला कामासाठी निघाला, पण वाटेतच त्याच्या ट्रेनला अपघात झाला. घरच्यांना जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा सर्वजण अस्वस्थ झाले, त्यानंतर दोन दिवसांनी अखिलेशच्या मृतदेहाचा फोटो पाहून आई आणि भावजय ओडिशाला गेले. तेथे मृतदेहाचीही ओळख पटली पण त्या मृतदेहावर 4 इतर जणांनीही दावा केला होता.
अशा परिस्थितीत त्याच्या आईला त्रास होत राहिला पण तिला आपल्या मुलाचा मृतदेह सापडला नाही. डीएनए चाचणीही झाली, मात्र, घटनेला 18 दिवस उलटूनही अखिलेशचा मृतदेह हाती लागलेला नाही. शेवटी अखिलेशची वृद्ध असहाय आई घरी परतली. ती आपल्या मुलाबद्दल कोणीतरी माहिती देईल, याची वाट पाहत आहे. अखिलेशच्या शेजारी राहणाऱ्या मंजय या आणखी एका तरुणाच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
मंजय विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मंजयचे वडील बृजनंदन राय हे देखील आपल्या मुलासाठी ओडिशाला गेले होते. परंतु त्यांच्या मुलाचा मृतदेह सापडला नाही किंवा कोणतीही माहिती मिळाली नाही. त्याचा डीएनए सॅम्पलही घेण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही मृतदेहाशी जुळले तर ते देता येईल. मात्र, आता येथून फोन केला असता, तिथून प्रतिसाद दिला जात नाही. या दोन्ही कुटुंबांची अवस्था आपल्या मुलाच्या मृतदेहाविना अस्वस्थ होत आहे.