संगमनेर – जोर्वे नाका परिसरात सशस्त्र जमावाचा आठ जणांवरील जीवघेणा हल्ला, राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आणि दिल्लीतील अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीची भररस्त्यात अत्यंत संतापजनक प्रकारे झालेली हत्या या सर्वाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून, त्यांच्याद्वारे आज तालुका बंदची हाक देण्यासह सकल हिंदू समाजाचा सहभाग असलेला “भगवा मोर्चा’ काढला जाणार आहे.
रविवारी (ता. 28) अगदीच किरकोळ कारणावरून जोर्वे येथील शेतकऱ्यांच्या आठ मुलांना संगमनेरातील जोर्वे नाका परिसरात सुमारे दीडशे ते दोनशेच्या सशस्त्र जमावाने हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने या सर्व घटनांचा रोष आता उसळून बाहेर पडू लागला आहे. त्यातच दिल्लीतील अत्यंत क्रूरपणे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण खुनाच्या घटनेचे व्हिडिओ विविध माध्यमांसह सोशल माध्यमातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने देशभरात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकलव्य संघटना या हिंदुत्ववादी संघटनांसह विविध राजकीय पक्ष, संस्था, गणेश मंडळे व संघटनांच्या सहभागातून सकाळी 9 वाजता लालबहाद्दूर शास्त्री चौक येथून “भगवा मोर्चा’ काढला जाणार आहे. तेथून बाजारपेठमार्गे सय्यदबाबा चौक, मेन रोड, चावडीवरून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते बसस्थानक चौक या मार्गावरून निघणाऱ्या या मोर्चाचा नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनासमोर समारोप होणार आहे.
या मोर्चात हिंदू समाजाला सहभागी होता यावे यासाठी आणि जखमी झालेल्या तरुणांना पाठबळ देण्यासाठी संगमनेर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.