नवी दिल्ली – राहुल गांधी परदेशात जाऊन भारतीय संस्थांचा अनादर करतात. ते भारताच्या विकासाच्या विरोधात आहेत. जगभर फिरून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात द्वेष पसरवणे हे राहुल गांधींचे प्राधान्याचे काम आहे. एकीकडे “मोहब्बत की दुकान’ची भाषा करणारे राहूल गांधीच “नफ़रत का बाज़ार’ फैलावत आहेत, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्यावर निशाणा साधला आहे.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, प्रेमाचा संदेश हे एक निमित्त आहे. राहुल गांधी द्वेषाचा बाजार पसरवत आहेत. राहुल मोदींच्या विकासाविरोधात अविश्वासाचा बाजार पसरवतात. द्वेषाचे दुकान चालवण्यासाठी ते बाहेर पडले आहेत.
अमेरिकेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजप लोकांना धमकावत आहे आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. लोकांना जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांवर भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या काम करणे खूप कठीण आहे. म्हणून आम्ही भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून श्रीनगरपर्यंत “भारत जोडो’ यात्रा काढली होती.