पुणे – भवानी पेठेतील टिंबर मार्केट येथे लाकडाच्या गोडाऊनला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली होती. ही अथक प्रयत्नानंतर विझविण्यात आली. पण, शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत येथे कुलिंगचे कार्य सुरू होते. या वखारी लोखंडी ढाच्याच्या असल्यामुळे तसेच लाकडी माल मोठ्या प्रमाणात जळाल्याने आग धुमसत होती. यामुळे अग्निशमन दलाने जळालेले लाकडांचे ढिगारे “जेसीबी’द्वारे हटवत पाण्याचा मारा केला.
या आगीमध्ये नऊ वखारी खाक झाल्या, तर 13 घरे, बंगला आणि एका शाळेला आगीची झळ पोहचली. अग्निशमन दलाच्या 30 गाड्या, 20 अधिकाऱ्यांसह 100 जवान घटनास्थळावर कार्यरत होते. शुकव्रारी लाकडाच्या ढिगाऱ्यांखालून आग धुमसत असल्याने अग्शिमन दलाच्या चार गाड्यांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत कुलिंगचे काम करण्यात येत होते.
येथील नाल्यालगत दुकाने आहेत. तेथे कचरा टाकला जातो. या कचऱ्यामुळे नाला तुंबू नये, यासाठी कचऱ्याला आग लावली जाते. या प्रकारामुळेही आग लागली असण्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जळालेल्या नऊ वखारींनमध्ये नावालाही काही उरले नाही. लाकडी माल, कागदपत्रे सर्व काही जळून खाक झाले. यामुळे वखारीचे मालक अस्वस्थ होते. आजही ते वखारींकडे येऊन थांबून राहिले होते. तर दुसरीकडे आगीची झळ बसलेल्या वखारींच्या मालकांनी दुकानातील माल हटवून त्यातील खराब माल बाजूला काढण्यासाठी कामगार बोलावून घेतले होते.
जलवाहिनी बंद…
टिंबर मार्केट हा अतिसंवेदनशील परिसर आहे. त्यामुळे अग्निशमन दलासाठी या परिसरात पाण्याची स्वतंत्र वाहिनी टाकलेली आहे. मात्र, ती बंद असल्याने अग्निशमन दलाला पाण्याची कमतरता भासली. ते जवळच्या कालव्यातून पाणी आणत होते. त्यात बरासचा वेळ गेला. त्यामुळे आग पसरली.
पालकमंत्र्यांकडून विचारपूस
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिंबर मार्केट परिसराला शुक्रवारी भेट दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यांनी जवानांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. दरम्यान, व्यापाऱ्यांनी पाटील यांच्याशी मार्केटमधील समस्यांबाबत चर्चा केली.