मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ यासारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाच्या भव्य दिव्य सेटने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे देखील कौतुक करण्यात आले होते. या सुपरहिट चित्रपटानंतर आता एसएस राजामौली लवकरच एका ड्रीम प्रोजेक्टवर काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘महाभारता’वर सिनेमा करण्याचं स्वप्न असल्याचे सांगितले होते.
याबाबत एका मुलाखतीत राजामौली यांनी सांगितले की, “मी जे सिनेमे बनवतो ते सर्व मी महाभारतावर आधारीत सिनेमा बनवण्यासाठीच शिकत आहे. महाभारतावरील सिनेमा हे माझं स्वप्न आहे आणि आतापर्यंत मी केलेला सिनेमा त्या स्वप्नपूर्तीकडे जाणारं पाऊलच आहे. मी जे काही चित्रपट करतो, त्यातून महाभारत चित्रपटासाठी काहीतरी शिकायला मिळते.’
पुढे ते म्हणाले, “आपल्या देशात महाभारताच्या अनेक आवृत्त्या आहेत. ते सर्व वाचण्यासाठी मला किमान एक वर्ष लागेल. कारण महाभारताची प्रत्येक आवृत्ती वाचण्यासाठी मला किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. जर मी महाभारतावर चित्रपट बनवला तर तो 10 भागांमध्ये असेल.मला चित्रपट बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही.”
महाभारतातील कास्टिंगबाबत प्रश्न विचारला असता राजामौली म्हणाले की, “महाभारतातील कास्ट अशा पद्धतीने लिहिण्यात येणार आहे की याआधी कोणी पाहिले नसेल किंवा ऐकले नसेल. महाभारताची कथा एकच असेल पण मी ती वेगळ्या पद्धतीने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.” सध्या त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.