मुंबई – शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले. आपण राजीनामा घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या, लोक भावनेचा आदर करत आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांनी 2 मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला होता. त्यानंतरी संध्याकाळी 5.30 वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतला.
नेमकं शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले? वाचा सविस्तर…
दिनांक 2 मे 2023 रोजी ‘लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे 63 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती. परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.
‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.
मी पुनश्च: अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.
आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी ‘मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद !