मुंबई – राज्यात काही महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यातील काही भागांत उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग कायम राहणार असून याचा फटका विदर्भाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. या नव्या आठवड्यांमध्ये विदर्भात नागपूरसह बऱ्याच राज्यांमध्ये वातावरणाची स्थिती कायम राहणार असून, आता इतक्यात तरी अवकाळी काढता पाय घेत नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विदर्भासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुण्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसू शकतो. 25 ते 27 एप्रिलदरम्यान पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. तर आठवड्याच्या मध्यापासून ते कमी होण्यास सुरुवात होईल.
उष्णतेचा दाह आणखी वाढणार
मराठवाड्यात अवकाळीसोबतच पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच गारपिटीचा तडाखाही बसणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. मुंबईसह कोकणात उष्णतेचा दाह आणखी वाढल्याचं जाणवणार आहे. ज्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या आरोग्य विभागाकडून देखील नागरिकांनी आरोग्य जपावे, असे आवाहन करण्यात आले आहे.