नवी दिल्ली : मागील ३६ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख खलिस्तानी अमृतपाल सिंग याला पोलिसांनी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रोडे गावातून अटक केली आहे. अमृतपालला सकाळी ६:४५ वाजता अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला रोडे गावात घेरले त्यानंतर त्याला पळून जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान,अमृतपालच्या अटकेवर आता त्याच्या आईने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान अमृतपालच्या अटकेवर त्याची आई बलविंदर कौर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलाला झालेल्या अटकेविषयीब लविंदर कौर यांनी बोलताना,”अमृतपालने आत्मसमर्पण केले आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे कारण तो वाघ आहे आणि त्याने योद्धाप्रमाणे शरणागती पत्करली. आम्ही कायदेशीर लढाई लढू आणि लवकरात लवकर त्याची भेटही घेऊ. असे म्हटले आहे.
तसेच अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग यांनी दावा केला की त्यांचा मुलगा ड्रग्जच्या विरोधात लढत आहे. “अमृतपालने आत्मसमर्पण केल्याचे आम्हाला टीव्हीवरून कळले. तो ड्रग्जच्या विरोधात काम करत होता, लोकांना वाचवण्यासाठी काम करत होता. त्यांना वाचवणाऱ्या तरुणांची सरकार बदनामी करत आहे, असे तरसेम सिंग म्हणाले.
अमृतपाल सिंग याच्या अटकेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मान यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या कारवाईची आपल्याला आधीच पूर्ण कल्पना होती आणि यामुळे आपण रात्रभर झोपलो नाही, असे ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.