नवी दिल्ली – करोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचे दिसून आले. यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचे युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटले आहे. या काळात भारतात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
युनिसेफच्या माहितीनुसार, दक्षिण आशियातील बालविवाह केलेल्या मुलींची संख्या 29 कोटी असून ही संख्या जगातील बालविवाहाच्या संख्येच्या 45 टक्के इतकी आहे. त्यामुळे जगातील बालविवाह रोखण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले होते ते अयशस्वी झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युनिसेफच्या प्रादेशिक संचालक नोआला स्किनर यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील वाढती बालविवाहाची समस्या ही अत्यंत निराशाजनक असून त्यावर योग्य ते नियंत्रण आणले जावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
अभ्यासात असे देखील समोर आले की, कोविड महामारीमुळे कुटुंबावर आर्थिक संकटे आली. यामुळे घरखर्च चालवणे देखील कठीण झाले. म्हणून अल्पवयातच मुलींचे लग्न लावून देण्याकडे या कुटुंबांचा कल वाढला असल्याचेही यात म्हटले आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये मुलींच्या लग्नाचे वय 20 वर्षे आहे, तर भारत आणि श्रीलंकेत 18 आणि अफगणिस्तान, पाकिस्तानात 16 वर्षे आहे.
बालविवाहाचे महत्त्वाचे कारण..
युनिसेफ संस्थेने यासंदर्भात सामान्य नागरिकांशी देखील चर्चा केली. यावर लोकांनी प्रतिक्रिया देत, गरिबीविरोधात सुरक्षा देणे, प्रत्येक मुलीच्या शिक्षणाच्या अधिकाराचे रक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बालविवाह केलेल्या मुलींना सर्वात जास्त धोका हा प्रसुती दरम्यान असतो. याशिवाय या मुलींना घरगुती हिंसाचार देखील सहन करावा लागतो.
देश बालविवाहाची संख्या
भारत – 2,66,10,000
इथियोपिया – 19,74,000
ब्राझील – 29,28,000
नायजेरिया – 33,06,000
बांग्लादेश – 39,31,000