नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या 24 तासांच्या आता एनसीईआरटी अर्थात नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अँड ट्रेनिंगने आपल्या 12वीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास सांगणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचे भाजपानेही स्वागत केले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
“एनसीईआरटीने मुघलांचा खोटा इतिहास हटविण्याचा एक चांगला निर्णय घेतला आहे. चोर, पाकिटमार आणि क्षुल्लक सडकछाप लोकांना मुगल साम्राट आणि भारताचे बादशाह म्हटले जायचे.
अकबर, बाबर, शाहजहान, औरंगजेब यासारख्या लबाड लोकांची गरज इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर कचरापेटीत आहे,’ असे भाजपनेते कपिल मिश्रा यांनी म्हणत या निर्णयाचे स्वागत केले आहे. एनसीईआरटीकडून वगळण्यात आलेल्या भागामध्ये 16व्या आणि 17व्या शतकातील मुघल साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश आहे. “थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी पार्ट टू’ या पुस्तकातील हा भाग वगळण्यात आला आहे.