पुणे -शहराला समान पाणीपुरवठा योजनेसाठी पालिकेकडून अडीच हजार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. पण, हे पाणी केवळ शहराच्या जुन्या हद्दीला दिले जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत शहराची हद्द दोन वेळा वाढली असून समाविष्ट गावांमध्ये पाणी पुरवताना महापालिकेची दमछाक होत आहे.
गेल्या तीन वर्षांत शहरातील पाण्याच्या टॅंकर फेऱ्यांची संख्या दरवर्षी तब्बल सरासरी 45 हजारांनी वाढत आहे. 2022-23 या वर्षात महापालिकेच्या 3 लाख 55 हजार टॅंकर फेऱ्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक फेऱ्या नव्याने समाविष्ट गावांमधील आहेत. त्यामुळे गावांना आणखी किती दिवस टॅंकरचा आधार घ्यावा लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गावांच्या समावेशामुळे जवळपास 5 ते 6 लाख लोकसंख्या नव्याने महापालिकेत समाविष्ट झाली आहे. या गावांना आधी महापालिका “रॉ वॉटर’ देत होती. मात्र, आता ही गावेच पालिकेत आल्याने त्यांना पाण्याची सोय करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. हे पाणी देण्यासाठी टॅंकर फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
…तोपर्यंत टॅंकरचाच आधार
समान पाणीपुरवठा योजना मार्च 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार आहे. मात्र, गावांसाठीही प्रशासनाने स्वतंत्र पाणी योजना करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येत आहेत. पण, समान पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरच गावांना प्राधान्य दिले जाईल. तोपर्यंत या गावांना टॅंकरचाच आधार असणार आहे.