तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके होणार लेखीनंतर
पुणे – उच्च शिक्षण विभागातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे, इयत्ता बारावीच्या तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिके परीक्षा झालेल्या नसल्यास, या परीक्षा लेखी परीक्षेनंतर पुढील महिन्यात घेता येणार आहे. दरम्यान बारावीच्या लेखी परीक्षेवर संपाचा काही फारसा परिणाम होणार नाही. परीक्षा सुरळीतपणे सुरु राहतील, असा दावा राज्य परीक्षा मंडळाकडून केला जात आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बळावर परीक्षा घेण्यासाठी नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक होऊन चर्चा करुन योग्य तो तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तरपत्रिका तपासणी वेळेत होणार
प्रलंबित मागण्या शासनाकडून मान्य केल्या जात नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बष्हिकार टाकला आहे. दरम्यान या शिक्षकांच्याही प्रश्नांसंदर्भात शासनस्तरावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून अडवू नका
इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरलेला कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शालेय शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात अडचणी निर्माण झाल्यास योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य मंडळाने विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
आता परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांनी शालेय शुल्क न भरल्यामुळे अथवा अन्य कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यास अडवणूक केली जाणे अथवा प्रवेशपत्र न देणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्र वितरणामध्ये अडचणी येत असल्यास राज्य मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना रमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी विभागीय मंडळांना दिल्या.