लखनौ – “सोशल मिडीया वाईटच’ अशी धारणा समाजात होत असताना, या सोशल मिडीयावरील दोन पोस्टबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना फेसबुककडून वेळेत सूचना मिळाल्याने दोघांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.
त्यासाठी तिने आणलेल्या झोपेच्या गोळ्यांचा फोटोही पोस्ट केला होता. दुसरीकडे, 31 जानेवारी रोजी गाझियाबादमध्ये एका व्यक्तीने, पंख्याला गळफास लावून घेण्याच्या तयारीत असतानाच्या प्रसंगाचे इंस्टाग्रामवर थेट प्रक्षेपण सुरु केले.
दोन्ही प्रकरणांमध्ये, टेक जायंट मेटा कंपनीने (फेसबुकची मूळ कंपनी) स्थानिक पोलिसांना तातडीने सावध करून या दोघांचेही आत्महत्येचे प्रयत्न हाणून पाडले. पोलिसांनी या दोन्ही तरुणांचा शोध घेतला आणि त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखले.
उत्तर प्रदेश पोलिस मेटा कंपनी यांच्यात झालेल्या परस्पर सामंजस्य करारामुळे एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत राज्यातील दोन लोकांचे प्राण वाचविण्यात मदत झाली आहे.
मार्च 2022 पासून उत्तर प्रदेश पोलीस आणि फेसबुक यांच्यातील प्रचलित करारानुसार, जर एखाद्या व्यक्तीने फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर आत्महत्या किंवा स्वत:ची हानी यासंबंधित काही पोस्ट केले तर मेटा मुख्यालय, अमेरिका येथून ताबडतोब पीएचक्यु उत्तर प्रदेश पोलिस यांच्याकडे संदेश पाठवला जातो. हा संदेश फोन कॉलसह ई-मेलद्वारे मिळताच, स्थानिक पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात येते.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक एटीएसचे राहुल श्रीवास्तव उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया सेंटरचे कामकाज पाहतात. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत अशा प्रकारे दहाहून अधिक लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. समस्येची संवेदनशीलता लक्षात घेऊन, आम्ही अशा प्रकरणांसाठी एक तपशीलवार प्रक्रिया आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करुन देत आहोत. ज्यामध्ये युनिसेफच्या व्यावसायिक समुपदेशकांकडून सतत पाठपुराव्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.