राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा – मराठी साहित्यिकांनी गांधींच्या स्वातंत्र्य संग्रामाची उपेक्षा केली. उपहास करत उग्र विरोध केला, तरीही साधले नाही. तेव्हा कोणीतरी गांधींचा खूनच करून टाकला, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांनी व्यक्त केले. ही मराठी साहित्यिकांची मोठी मर्यादा आहे. कदाचित बहुतांशी लेखक हे ब्राह्मण होते आणि टिळकपंथी होते, म्हणून गांधी आपलेसे वाटले नाही, जातीयतामध्ये आली आणि असे घडले असे मत त्यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत अभय बंग यांनी गेल्या शंभर वर्षातील मराठी साहित्य आणि साहित्यिकांवर जोरदार टीका करत गांधीविरोधी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन विचार करायची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ अभय बंग म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि ते वर्ध्यात होतेय. त्यामुळे तुम्ही मला संधी दिलेली आहे. मी आज दोन अतिशय गंभीर विधान साहित्याच्या बाबतीत करू इच्छितो. पहिला म्हणजे महात्मा गांधी हे एक विलक्षण महानायक 1920 ते 1947 च्या काळात होते. त्या काळात एक महाभारत (स्वातंत्र्य संग्राम) भारतात घडले. मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्याने याबद्दल न्याय केला का?
मला असं वाटते वैचारिक क्षेत्रात केला गेला. मात्र, ललित साहित्यात याबद्दल दुर्दैवाने वाळवंटच आढळते. काही तुरळक अपवाद सोडता येतात. मात्र बहुतांश मराठी साहित्य आणि मराठी साहित्यिक हे स्वातंत्र्य युद्ध आणि गांधी विचार व गांधींसारख्या महानायकापासून अलिप्तच राहिले. फ्रेंच राज्यक्रांतीवर, रशियन क्रांतीवर तिथल्या लेखकांनी अप्रतिम लिखाण केले. मात्र मराठीमध्ये असे काहीही झाले नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर मराठीत लोकप्रिय कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. मात्र, हा जिवंत इतिहास जो गेल्या शतकामध्ये मराठी साहित्यिकांच्या अंगणात, दारात आणि घराघरात घडला. त्यासंदर्भात बहुतांशी मराठी साहित्यिक केवळ दूरच राहिले नाहीत तर त्यांनी त्याची उपेक्षा केली, उपहास केला आणि उग्र विरोधही केला. आणि तरीही साधले नाही, तरी कोणीतरी गांधींचा खूनच करून टाकला. ही मराठी साहित्यिकांची मोठी मर्यादा आहे. या महाभारतातून एखादे महाकाव्य लिहावे, एखादी महाकादंबरी घडावी असं काहीही घडले नाही. उलट दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला.
मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन शांतपणे विचार करायला पाहिजे की असे का घडले. आमचा संकुचित प्रांतवाद मध्ये आला की गांधी मराठी नव्हते, असे डॉ अभय बंग म्हणाले.