बारामती -शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची चाललेली धडपड या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मला दिसून आली. तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे आणि शेतीतील नवीन्य शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत. हीच बाब अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनात व्यक्त केली.
शरद पवार आणि राज्याची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच आमदार निलेश लंके यांनी कृषी प्रदर्शनाला धावती भेट दिली. या ठिकाणी शेतीतील नवीन प्रात्यक्षिके व नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी तज्ञांकडून घेतली आणि यानंतर शरद पवार हे सायन्स पार्कमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले या देशातील बदल शेतकऱ्यांनी घडवला आहे. मागील पंधरा वर्षात जी शेती विषयक धोरणे झाली त्यातून अन्नधान्याचे उत्पादन वाढलं आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये मला तरुणांबरोबरच काही माझ्या ओळखीचे हजारो शेतकरी भेटले. त्यांनाही हे नवे तंत्रज्ञान खुणावत आहे.
80 टक्के ही तरुणांची या प्रदर्शनामधील संख्या पाहून मला अतिशय आनंद वाटला. शेतीतील हे नवे बदल टिपण्याबरोबरच आता नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग शेतीमध्ये सुरू होत आहे त्या दृष्टीने बारामती मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र सुरू होत आहे याचा शेती आणि शेतीच्या क्रांतीमध्ये खूप मोठा बदल होईल आणि त्यासाठी त्याची मदत होईल असे मला वाटते.
या प्रदर्शनात माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांनीही भेट दिली. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी सोमवारी एक दिवस प्रदर्शन कालावधी वाढवला आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.