पिंपरी – यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या शव विच्छेदन विभागातून मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार चौकशी अहवालात वायसीएममधील पोलीस चौकीत कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर ठपका ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस करत चौकशी समितीने कारवाईचा चेंडू पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या कोर्टात ढकलला आहे.
भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या दापोडीतील एका महिलेचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्या महिलेचे शव विच्छेदन करण्यासाठी वायसीएम रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये दाखल करण्यात आले. शव विच्छेदन करतेवेळी त्याठिकाणी तीन महिलांचे मृतदेह होते. त्यामुळे शव विच्छेदन करून झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्याकडून मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार 19 ऑक्टोबर 2022 रोजी घडला. या प्रकारामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या केबिनची तोडफोड केली होती. हे प्रकरण चांगलेच चिघळल्याने आयुक्त सिंह यांनी याची गंभीर दखल घेतली होती. आयुक्तांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. चौकशी अहवालानुसार संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात आले. तर, पालिकेच्या एका कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
मुळात, शवागृहातील मृतदेहाचे विच्छेदन करण्यापूर्वी मृत व्यक्तीचा तपशील असलेली पिवळ्या रंगाची चिठ्ठी (टॅग) कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाच्या पायाच्या आंगठ्याला बांधणे अपेक्षित असते. मात्र, पिवळी चिठ्ठी बांधताना संबंधित पोलीस कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित नसल्याचे चौकशीत समोर आले असल्याचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले. तसेच, महिलेचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देताना पोलीस हवालदार चंद्रकांत तिटकारे त्याठिकाणी हजर नव्हते, असे त्यांनी लेखी जबाबात नमूद केल्याचे आढळले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला पोलीसच जबाबदार असल्याचा कयास काढत चौकशी समितीने कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे करुन संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याने चौकशीबाबतच संशय निर्माण झाला आहे.
चोर सोडून सन्याशाला फाशी
मृतदेहाची अदलाबदल झाल्यानंतर चौकशीत दोषी आढळल्याने शवागृहातील कंत्राटदाराद्वारे नियुक्त कामगाराला कामावरून काढून टाकण्यात आले. तसेच, पालिकेच्या कर्मचाऱ्याची चौकशी लावण्यात आली. त्याचबरोबर पोलीस चौकीतील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दोषारोप ठेवून कायद्यातील बाबी पडताळून त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस पोलीस आयुक्तांकडे केली. मात्र, हे शवागृह ज्यांच्या नियंत्रणाखाली चालते, त्यांच्यावर मात्र, कारवाई करण्याबाबत चौकशी समितीतील सदस्य अधिकारी ब्र शब्द काढत नाहीत. विच्छेदनासाठी मृतदेह दाखल करून घेताना कर्मचाऱ्यांसह विभागप्रमुखांची देखील तेवढीच जबाबदारी असते. त्यामुळे कोणालातरी वाचवण्यासाठी कोणाचा तरी बळी दिला जात असल्याचा प्रकार चौकशी समितीच्या भूमिकेवरुन स्पष्ट होत असल्याची चर्चा रंगली आहे.