Hasan Mushrif – महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सुरु असलेला सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात जरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली असली तरीदेखील हा वाद थांबलेला नाही. सध्या नागपुरात सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही राज्यांतील सीमावादावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे मराठी बांधवांच्या समर्थनासाठी बेळगावात जात असताना त्यांना कर्नाटक पोलिसांकडून अडवण्यात आले.
याबाबत मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,”बेळगाव येथे मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी जात असताना कोगनोळी टोल नाक्याजवळ आल्यावर शांततेच्या मार्गाने मोर्चे घेऊन जात असताना कर्नाटक पोलिसांकडून आमच्यावर लाठीहल्ला केला. एका लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होत असेल, तर तेथील मराठी भाषिकावर किती अन्याय व अत्याचार होत असेल याचा विचार केला पाहिजे. लवकरात लवकर बेळगाव, बिदर, निपाणी आणि कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.”
बेळगाव येथे मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी जात असताना कोगनोळी टोल नाक्याजवळ आल्यावर शांततेच्या मार्गाने मोर्चे घेऊन जात असताना कर्नाटक पोलिसांकडून आमच्यावर लाठीहल्ला केला. एका लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होत असेल pic.twitter.com/JV3T3vbkoW
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) December 19, 2022
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील हा सीमावाद अनेकवेळा समोर आला आहे. या ठिकाणी सीमेवर असलेल्या मराठी भाषिकांकडून वेळोवेळी आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे, अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. त्याचबरोर महाराष्ट्रातील कानडी भाषिक असलेल्या प्रदेशावर कर्नाटककडून अनेकवेळा आपला दावा सांगण्यात आलाय. मात्र हा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला आहे. या वादामुळे सीमेवरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर बेळगावात मराठी बांधवांवर झालेल्या अन्यायाचे पडसाद थेट कोल्हापूरमध्येही मोठ्या प्रमाणात उमटतात.
या सीमावादादरम्यान अनेक मंत्र्यांनी तसेच वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांनी तेथील मराठी भाषिक जनतेला पाठिंबा देण्यासाठी बेळगावात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे कर्नाटक सरकार आपली मुजोरी करत आहे. बेळगावात जात असताना अनेक लोकप्रतिनिधींना कर्नाटक पोलिसांकडून अडवण्यात आले आहे. दोन्ही राज्यांचा हा सीमावाद सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे.