औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात अनेक आंदोलनं आणि संप सुरू असताना आता नुकतंच पुणे शहरात रिक्षा संघटना आक्रम झाली होती. शहरातील बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करावी, रिक्षा परमिट बंद करावे, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटनांनी पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर सोमवारी चक्काजाम आंदोलन केलं होत. आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचं यावेळी पाहायला मिळाले.
मात्र, त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा बेमुदत बंद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आज पासून औरंगाबाद येथील रिक्षा संघटना संपावर जाणार आहेत. १९ रिक्षा संघटनेच्यावतीने औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीने शहरात आज, एक डिसेंबरपासून रिक्षा बंदचे आवाहन केले आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाही, या करता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, रिक्षा मीटर कॅलीब्रेशनसाठी तीस दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ मार्च २०२४ पर्यंत करावी. रिक्षा थांबे देण्यात यावे. रिक्षा पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात यावे. अश्या अन्य मागण्यांसाठी तब्बल १९ रिक्षा संघटनेच्यावतीने औरंगाबाद शहरात आज, एक डिसेंबरपासून रिक्षा बंदचे आवाहन केले आहे. सदर बंद बेमुदत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.