आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज 726व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी यावर्षी आळंदीत पाच लाखावर भाविक दाखल होते. यावेळी बुधवार (दि. 23) दुपारच्या वेळी 45 वर्षीय भाविक महिला इंद्रायणीत स्नान करित असताना भोवळ येऊन नदीत पडली. पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडत होत्या.
यावेळी इंद्रायणी घाटावर भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन एन.डी.आर.एफ. पथकाचे जवानांनी तात्काळ महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सध्या भाविक महिलेची प्रकृती स्थीर असल्याची माहिती, आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक उर्मिला शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, कार्यालयीन अधिक्षक किशोर तरकासे, अग्निशमन विभाग प्रमुख अक्षय शिरगिरे, साधना शिंदे यांनी भाविक महिलेची रुग्णालयात भेट घेतली.