आळंदी, दि. 15 (एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड ) –
यात्रे अलंकापुरा येती ।
ते आवडती विठ्ठला ।।
पांडुरंगे प्रसन्नपणे ।
दिधले देणे हे ज्ञाना ।।
भुवैकुंठ पंढरपूर ।
त्याहुनी थोर महिमा या ।।
निळा म्हणे जाणोनि संत ।
धावत येती प्रतिवर्षी ।।
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशीनिमित्त (आळंदी यात्रा) आळंदी प्रशासनाची तयारी पूर्णत्वास येत आहे. आळंदीकर ग्रमास्थ, प्रशासन, माऊली संस्थान भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यात्रेनिमित्त राज्यभरातील गावोगावचे भाविक, दिंड्यांचे अलंकापुरीत आगमन होत असून काही ठिकाणी सप्ताहांना सुरुवात देखील झाली आहे. राहुट्या, पाल ठोकण्याचे काम सुरू आहे.
करोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वारी सोहळा पार पडणार असल्यामुळे यावर्षी 10 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने व्यवस्था केली आहे. भाविक आता अलंकापुरीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील मानाची पहिली दिंडी वासकर महाराज दिंडीचे आळंदीत आगमन झाले आहे. बुधवारी (दि.16) संत नामदेव महाराज तर गुरुवारी (दि. 17) श्री पांडुरंगराय दिंडीचे आगमन होणार आहे. गुरुवारपासून (दि. 17) यात्रेला सुरुवात होणार आहे. रविवारी (दि. 20) कार्तिकी एकादशी, मंगळवारी (दि. 22) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे.
आरोग्य विभाग सज्ज
यात्रेला आलेल्या भाविकांना आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी आळंदी आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता अधिकचे मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. 24 तास आरोग्यसेवा पुरविण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण तयारी आता पूर्णत्वास येत आहे. 102/108 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहे, रुग्णांसाठी वार्ड सुसज्ज करण्यात आले आहे, शहर हद्दीत 5 ठिकाणी औषधोपचार बुथ स्थापन करण्यात येत आहेत. शहरातील पाणी शुद्धीकरण सुरू आहे, आपात्कालिन कक्ष सज्ज आहे, भाविकांना एक्सरे, लॅब तपासण्या, ईसीजी, सर्व उपचार मोफत असणार आहेत, दर्शनबारी परिसरात आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली आहे.
24 तास वीजपुरवठा
यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील आवश्यक देखभाल दुरुस्ती प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे. भाविकांना यात्राकाळात 24 तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. महावितरण वीज विभागाचे सर्व कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत, अशी माहिती आळंदी महावितरण विभागाचे सहायक अभियंता सुभाष धापसे यांनी दिली.
माऊली मंदिरात आज होणारे कार्यक्रम
पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा, दुपारी 12.30 ते 1 श्रींना महानैवेद्य, सायंकाळी श्रींची दिंडी (श्रीगुरू हैबतरावबाबा दिंडी) पंढरपूरातून आगमन, नगरप्रदक्षिणा व हैबतबाबा ओवरीपुढे आरती. रात्री 8 ते 8.30 धुपारती. रात्री 9 ते 11 बाबासाहेब आजरेकर यांच्यातर्फे कीर्तन सेवा, रात्री 10 ते 12 हैबतबाबा पायरीपुढे वासकर महाराज यांच्यातर्फे जागर, रात्री 2 ते पहाटे 4 हैबतबाबा आरफळकर यांच्यातरर्फे हैबतबाबांच्या पायरीपुढे जागर होईल.
पीएमपीकडून 300 जादा बसची सुविधा
पुणे, दि. 15 -पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) आळंदी यात्रेसाठी 17 ते 23 नोव्हेंबर दरम्यान 300 बस जादा सोडण्यात येणार आहेत. तर, 19 ते 22 या दरम्यान प्रवाशांच्या मागणीनुसार रात्री उशीरापर्यंत बस सोडण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.
कार्तिकी एकदशी निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात भावीक आळंदीला भेट देतात. भाविकाच्या सेवेसाठी पीएमपीतर्फे दिवसा आणि रात्री उशीरा पर्यंत बस सोडल्या जातात. तसेच आळदी येथील सध्या असलेले पीएमपी स्थानक काटेवस्ती येथे स्थालांतरित करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या बसना रात्री दहानंतर पाच रुपये तिकीट जास्त आकारण्यात येणार आहे. तसेच, कोणतेही पास रात्री दहानंतर चालणार नाहीत. या काळात भोसरी पाबळ व आळंदी मकरकळ हे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांनी पीएमपी बसचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.